पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई
रांजणगाव, दि. ७ जून २०२५ पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अतिशय कुशल तपासामुळे तीन खून करणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असून, मृतदेहांची ओळख पटवणे आणि आरोपीचा शोध घेणे हे मोठे आव्हान होते. नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या व्यापक आणि तांत्रिक तपासामुळे गुन्हा उघडकीस आला आहे.
तिघांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह
२५ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, पुणे-नगर महामार्गालगत एका बंद ग्रोवेल कंपनीजवळील कच्च्या रस्त्याच्या बाजूला एक महिला व दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. या गंभीर घटनेची नोंद IPC 2023 च्या कलम १०३(१), २३८ अंतर्गत गु.र.नं. १६४/२०२५ प्रमाणे करण्यात आली.
सात तपास पथकांची नेमणूक, हजारो सीसीटीव्ही चा मागोवा
मृतदेह अनोळखी असल्याने तपास अधिक कठीण झाला. मात्र मृत महिलेच्या हातावर “जयभीम”, “Rajratan”, “mom dad”, “R S” असे गोंदविलेले असल्यामुळे तपासाला दिशा मिळाली. पोलिसांनी वाघोली ते राहुरी दरम्यान २५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचप्रमाणे १६,५०० भाडेकरूंना चौकशीसाठी तडाखा देण्यात आला.
महाराष्ट्रभर शोधमोहीम; शेवटी ‘बीड’मधून शोध लागला
पोलीस अधीक्षक गिल्ल यांनी संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांना पाच दिवसांपूर्वी एकत्र बोलावून बैठकीचे आयोजन केले. प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथके रवाना केली गेली. बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल मानव मिसिंग प्रकरण (दि. ९/५/२०२५) यात नमूद महिला आणि मुलांचे वर्णन मृतदेहाशी मिळत असल्याचे निदर्शनास आले.
स्वाती सोनवणे आणि तिच्या मुलांचा निर्दयी खून
तपासादरम्यान मृत महिलेची ओळख स्वाती केशव सोनवणे (वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) अशी पटली. तिच्या दोन मुलांमध्ये स्वराज (२ वर्षे) आणि विराज (१ वर्ष) यांचा समावेश होता. ती आपल्या बहिणीच्या दिरासोबत – आरोपी गोरख पोपट बोखारे (वय ३६, रा. सरदवाडी, ता. शिरूर, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) – आळंदी येथून मोटरसायकलवरून निघाली होती.
प्रेमसंबंधातून तिघांचा बळी
स्वाती व गोरख यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. स्वाती त्याच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरत होती. या मागणीला कंटाळून गोरखने २३ मे रोजी रात्रीच्या सुमारास तिघांचाही खून केला. त्यांनी गळा दाबून, डोक्यात दगड घालून हत्या केली. नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
आरोपी पोलीस कोठडीत
रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी आरोपी गोरख बोखारेस ताब्यात घेतले असून, त्यास १९ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उत्कृष्ट तपासासाठी संपूर्ण यंत्रणेचे योगदान
या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, बापूराव दडस यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. तसेच पोनि महादेव वाघमोडे, पोनि अविनाश शिळीमकर, पोसई विश्वास जाधव, स.पो.नि. दत्ताजी मोहिते व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी अथक प्रयत्न केले. ही तपासाची प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस दलातील कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.