लोणीकंद, श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीच्या श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक योगदिन २१ जून रोजी मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. “योग – सुसंवाद व शांतीसाठी” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन हार्टफुलनेस संस्था आणि महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग संचालिका डॉ. सुषमा तायडे व एन एस एस, एस.डब्ल्यू.ओ. विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकर भूमकर होते, योग दिनानिमित्त सहभाग घेतलेल्या प्रत्येकाने प्रशिक्षक म्हणून भूमिका भूमिका बजावावी आपले मित्र व कुटुंब यांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आव्हान सचिव यांनी केले.तसेच ह्या कार्यक्रमात खजिनदार उद्धव भूमकर, तांत्रिक संचालक सिद्धांत भूमकर, तसेच डीएमटी कंपनीचे संचालक विक्रम मखवाना यांच्या प्रमुख उपस्थितीत योगादिन साजरा करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. अविनाश देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमात हार्टफुलनेस संस्थेचे प्रसिद्ध योग प्रशिक्षक विनय गुप्ता, मायक्रोसॉफ्टचे प्रतिनिधी देवेंद्र थत्ते, झेन्सार कंपनी उपाध्यक्ष हर्बल जावळे, टीसीएस इन्फ्रास्ट्रक्चर अभियंता गौतम सागर, शैक्षणिक तज्ज्ञ नेहा रावत, यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला. हार्टफुलनेस योग प्रशिक्षक विनय गुप्ता यांनी उपस्थितांना योगासने, ध्यान व श्वसन तंत्रांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या घोषवाक्याशी एकात्मभावाने बांधिलकी व्यक्त केली. योगाची जीवनशैलीमधील भूमिका आणि त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत उपस्थितांना जाणिव जागृती झाली.
जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले महाविद्यालयाचे संस्थापक, सचिव शंकर भुमकर यांनी आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नियमित योगा करणे गरजेचे आहे. केवळ शरीरच नव्हे तर आत्मा जागृत ठेवण्यासाठी देखील योगा हा एक प्रभावी मार्ग आहे. “पूर्वी ऋषीमुनी जंगलात तप करत असताना योगाचा अवलंब केला सततच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव, शारीरिक थकवा, आणि विविध आजार वाढत आहेत. अशा वेळी योगा हा एक नैसर्गिक आणि शाश्वत उपाय आहे.
योगामुळे शरीरातील विविध विकार नियंत्रणात राहतात. श्वसन प्रणाली, पचन क्रिया, हृदयाची गती यावर योगाचा सकारात्मक परिणाम होतो. मानसिक शांतता आणि आत्मिक स्थैर्य मिळवण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात. रोजचा योग आयुष्य वाढवतो आणि जीवनशैली आरोग्यदायी बनवतो. असेही फायदे होत असल्याचे शंकर काकांनी ठामपणे नमूद केले.