प्रतिनिधी | लोणीकंद
बकोरी (ता. हवेली) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बकोरी येथील देवराई वनराई प्रकल्पात तब्बल ५०० देशी झाडांचे वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यानिमित्ताने या वर्षी एकूण २१ हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, “वृक्षलागवडीची ही मुहूर्तमेढ आज रोवली,” अशी माहिती देवराई वनराईचे प्रकल्पाचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी दिली.
बकोरी देवराईत देशी झाडांचे वृक्षारोपण
या उपक्रमात पंचक्रोशीतील विविध कंपन्यांचे कर्मचारी, पुण्यातील सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी आणि वृक्षमित्र यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वड, पिंपळ, करंज, चिंच, अर्जून, कडुनिंब आणि बेल अशा देशी प्रजातींची लागवड करण्यात आली.
“पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवायचा असेल, हवामानातील बदल रोखायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या परीने झाडे लावली पाहिजेत,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
प्रशासनाची वृक्षारोपणाकडे पाठ; वारघडे यांची नाराजी व्यक्त
मात्र, या महत्त्वपूर्ण उपक्रमात स्थानिक प्रशासनाने पाठ फिरवल्याची खंत वारघडे यांनी व्यक्त केली. महसूल, वनविभाग तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले असतानाही एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही, ही बाब निराशाजनक असल्याचे ते म्हणाले.
बकोरी देवराईत आतापर्यंत १ लाख झाडांची लागवड; आता १ कोटी झाडांचे लक्ष्य..
२०१७ पासून सुरू असलेल्या बकोरी देवराई वनराई प्रकल्पात आतापर्यंत १ लाख झाडे लावण्यात आली आहेत. पुढील काळात १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प असून, “पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे,” अशी माहिती वारघडे यांनी दिली.