एका मागून एक प्रकरणं – पण कारवाई शून्य
प्रश्न असा — नियम सर्वांसाठी एकसारखेच का नाही?
वाघोली – “नियम सर्वांसाठी सारखे” हे म्हणायला महावितरणचे अधिकारी पुढे असतात, पण अंमलात आणायची वेळ आली की, तेच नियम आठवणीच्या गाळात गडप होतात. वाघोलीतील महावितरण विभागाचा कारभार सध्या ‘दिवा बुभुका’सारखा झाला आहे – उजेड दाखवायचं नाटक पण सर्वसामान्य नागरिक मात्र अंधारात!
भावडी रोडवरील चार नंबर परिसरातील ट्रान्सफॉर्मर गेल्या पाच-सहा दिवसांपासून जळालेला आहे. नियमांनुसार शहरी भागात २४ तासांत आणि ग्रामीण भागात ४८ तासांत ट्रान्सफॉर्मर दुरुस्त किंवा बदली होणे अपेक्षित असताना, येथे पाच दिवस झाले तरी उजेडाचा पत्ता नाही. नागरिक अंधारात असूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांना ‘सवड नाही’!
वाघोलीतील महावितरण विभाग सध्या चर्चेचा विषय ठरतोय – ट्रान्सफॉर्मर चोरी, डीपी बॉक्स रस्त्यावर पडलेले, ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत गुप्तता, आणि आता हा नवा जळालेला ट्रान्सफॉर्मर. इतकी प्रकरणं समोर येऊनही कुठलाही ठोस बदल दिसत नाही.
सर्वसामान्य नागरिक जर बिल थोडं उशिरा भरलं, तर तत्काळ दंड आणि वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाते. पण अधिकारी आणि यंत्रणा अपयशी ठरली, तर त्यांच्यावर कोणती कारवाई? नियम सांगणाऱ्यांनीच नियम तोडायचे, तर विश्वास कोणावर ठेवायचा?
महावितरणने सेवा हमी नियमांचे उल्लंघन केल्यास नागरिक नुकसान भरपाईस पात्र आहेत. त्यामुळे या प्रकारात बाधित नागरिकांनी लेखी तक्रार करून आपला हक्क मिळवावा, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.