योग्य ती कारवाई न झाल्यास ; जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा..
लोणीकंदः भावडी आणि लोणीकंद या भागांतील बेकायदेशीर खाण व स्टोन क्रशर व्यवसायांविरोधात तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा अॅड. सागर भोसले यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांना पाठवलेल्या कायदेशीर नोटीसद्वारे दिला आहे.
ही नोटीस गणेश जयसिंग शिंदे (रा. लोणीकंद ता.हवेली) यांच्या वतीने देण्यात आली असून, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपविभागीय अधिकारी हवेली, तहसीलदार हवेली, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी लोणीकंद/भावडी आणि संबंधित खाण क्रेशर चालकांना पाठवण्यात आली आहे.
नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, भावडी, लोणीकंद, फुलगाव या गावांमधील स्टोन क्वारी बेकायदेशीररीत्या चालू आहे. उत्खननाचा परवाना कालबाह्य असून, नव्याने कोणताही वैध परवाना मिळालेला नाही. तरीदेखील उत्खनन सुरू आहे, रॉयल्टी भरण्यात मोठ्या प्रमाणात टाळाटाळ केली जात आहे, तर वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने परवाना, टॅक्स आणि आरटीओ नियमांच्याही बाहेर आहेत, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
या अवैध उत्खननामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत असून, नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ध्वनी व धूळ प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार आणि इतर आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनीही या परिसरातील स्थितीबाबत प्रशासनाला इशारा दिल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या असूनही कारवाई होत नसल्यामुळे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी प्राणांतिक उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले, मात्र अद्याप ठोस पावले उचलण्यात आली नसल्याची खंतही या नोटीसमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, १५ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल व त्याचा सर्व खर्च शासन व संबंधित अधिकाऱ्यांवर टाकण्यात येईल, असा इशाराही गणेश शिंदे व अॅड. सागर भोसले यांनी दिला आहे. शासनाच्या नियम व अटींचे उल्लंघन करून चालवले जाणारे हे खाण व स्टोन क्रशर उद्योग तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.