वाघोली परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्यातील अडचणींच्या जोडीला आता जीवघेण्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. आव्हाळवाडी फाट्याजवळील मुख्य रस्त्याच्या कडेला महावितरणकडून बसविण्यात आलेले डीपी (डिस्ट्रीब्युशन पॉईंट) बॉक्स अत्यंत खराब अवस्थेत असून, बॉक्स अक्षरशः कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
या बॉक्सच्या संरक्षणासाठी कुठलीही योग्य यंत्रणा नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी या बॉक्सना दगडांचा आधार देऊन सावरलेले दिसून येत असून, हे प्रकार धोक्याचे स्पष्ट चिन्ह आहे. अनेक डीपी बॉक्स फाटलेले, गंजलेले व उघडे असून त्यातून विद्युत ताराही बाहेर आलेल्या आहेत. या उघड्या तारा व खराब बॉक्समुळे पादचाऱ्यांना, विशेषतः लहान मुलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा महावितरणकडे तक्रारी केल्या असून, काही वेळा अधिकारी पाहणीसही आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. “महावितरणचे कर्मचारी येतात, पाहणी करतात पण पुढे काहीच घडत नाही,” असे एका रहिवाशाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
या समस्येकडे महावितरण प्रशासन, महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.