निमगाव म्हाळुंगी,(ता. शिरूर ): जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे निष्पाप हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निमगाव म्हाळुंगी येथे शिवराज्य प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने कॅण्डल मार्च रॅलीचे आयोजन करण्यात आले. सरपंच बापूसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शांततामय रॅलीत ग्रामस्थांनी दहशतवादाच्या विरोधात एकजूट दाखवली आणि हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली.
या रॅलीमध्ये दिलीप चव्हाण, दादासाहेब घोरपडे, तान्हूबाई चव्हाण, आशा कुंभार, स्वाती दोरगे यांच्यासह अनेक युवक, महिला आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत ‘दहशतवादाचा नाश व्हावा’ आणि ‘मृत पर्यटकांना न्याय मिळावा’ असा आवाज बुलंद केला.
या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले, “धर्माच्या नावावर निर्दोष पर्यटकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. हीच खऱ्या अर्थाने मृतांना श्रद्धांजली ठरेल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन आशाताई कुंभार यांनी केले. या रॅलीमुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचा आणि एकतेचा संदेश पोहोचला.